बहुमत असूनही मोदी सरकारला शरद पवार, उद्धव ठाकरेंची भिती वाटते



केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे, असे जे सुरु आहे, त्यामुळे विष्णूचे आवडते फूल असलेले ‘कमळ' बदनाम झाले आहे. ऑपरेशन लोटस म्हणजे 'कमळ' हा अलकायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे. तसेच मोदी सरकार हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घाबरत असल्याचा दावाही शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

केंद्र सरकार व त्यांच्या सूत्राधारांना २०२४ चे भय वाटते. हे भय केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहे. इतके मोठे बहुमत असतानाही या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच हे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र आणि सूडाची छापेमारी ही त्यांचे शस्त्रे आहेत. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ' होते, पण कमळाच्या लाभार्थ्यांवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाड्यास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे, असे ‘सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे. केंद्र सरकार आणि त्यांच्या सूत्रधारांना २०२४ चे भय वाटते. या सूत्रधारांना आपल्या सावलीचेही भय वाटते. म्हणून ते नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या पाठी लागले आहेत. असा दावाही शिवसेनेने केला आहे.

आज राज्यकर्त्यांचा कारभारच असा सुरु आहे की, देशात संभ्रमित युग अवतरले आहे. देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा अनेक गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. हे संभ्रमाचे युग संपवण्यासाठी कोण अवतार घेणार? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल, असेही ‘सामना'त म्हटले आहे. शिवसेनेकडून 'आप'ची पाठराखण उत्पादन शुल्क गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून सध्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया कचाट्यात सापडले आहेत. शिवसेनेने अग्रलेखातून त्यांची पाठराखण केली आहे. मनिष सिसोदिया यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पण सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली. महाराष्ट्रातही सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर झाला. संजय राऊत यांनाही सरकार पाडण्यासाठी मदत करा, नाहीतर ईडीचा फास आवळू, अशा धमक्या देण्यात आल्या. संजय राऊत यांनी ही गोष्टी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती व्यंकय्या नायडू यांना कळवली होती. पण सध्या कोण कोणाचे ऐकणार? ना पेशी, ना सुनवाई. तारखांचाच खेळ सुरु आहे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments