'राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बडा नेता पराभूत होणार'



राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून येणार, हे नक्की आहे. मात्र या निवडणुकीत मोठा नेता पराभूत होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापुरात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले असता आता याची जोरदार चर्चा सुरु आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. त्यासाठी घोडेबाजार होणार नाही. मात्र राज्यातील एक बडा नेता पराभूत होईल. आमचे नियोजन पक्के आहे. वाटल्यास महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करून त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा. महाविकास आघाडीचे सर्व नेते भाजपवरच टीका करतात, असेही ते म्हणाल आहेत.

विरोधकांना झोपेतसुद्धा भाजपच दिसतो. हे तिन्ही पक्ष एकमेकांशी खूप भांडतील; मात्र ते सरकार पडू देणार नाहीत. कारण त्यांना हे पक्क माहिती आहे की सरकार पडल्यावर पुन्हा भाजपच सत्तेत येणार आहे. ज्या वेळी आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्या वेळी सगळा हिशेब चुकता करू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

जीएसटीचे १४ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते की १४ हजार कोटींची रक्कम ही पॅट्रोलवरील व्हॅट कमी करण्यासाठी नाही. या पैशांतून ते कर कमी करणार नाहीत. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार नाहीत. मग है पैसे ते जमिनी खरेदीसाठी वापरणार का?”

Post a Comment

0 Comments