एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली.
या घटनेमुळे एकच खबळबळ उडाली होती. त्याचबरोबर राजकीय वर्तुळात देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून, कालच त्यांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण या प्रकरणावरुन आता भाजपने राज्याच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलजी कशाला सिल्वर ओक आंदोलनाच्या चौकशीचा फार्स करताय?, असा प्रश्न महाराष्ट्र भाजपने विचारला आहे. “ज्या विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते महा विकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षा पुरवत नाहीत आणि तरीही तुम्ही त्यांनाच चौकशी प्रमुख नेमता, असा टोला भाजपने लगावला आहे. जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का?, असेही भाजपने या आंदोलनासंदर्भातील इशारा देणारे पत्र पोस्ट करत म्हटले आहे.
भाजपने पोस्ट केलेल्या पत्रामध्ये हे पत्र चार एप्रिल रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस सह आयुक्तांना पाठवले होते. एसटी कर्मचारी किंवा आंदोलन हे अधिक आक्रमक होऊन आंदोलन करणार असल्याचे या पत्रामध्ये नमूद केले आहे. विलनीकरणाच्या मुद्द्यावरुन १० नोव्हेंबर पासून ते २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन सुरु होते
हे आंदोलन गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनाचे आयोजक गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली २५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत आंदोलन सुरु होतं. १ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत या आंदोलनाचे नेतृत्व कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. २१ डिसेंबरपासून कृष्णन नारायण कोरे, ताजुउद्दीन मुनीर उद्दीश शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तारीख पाच एप्रिलची उच्च न्यायालयाची सुनावणीची असून सध्या आझाद मैदानात १५०० ते १६०० महिला आणि पुरुष आंदोलकर्ते आहेत. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत आहे. निर्णय विरोधात लागण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिल रोजी मंत्रालय आणि ५ एप्रिल रोजी सिल्व्हर ओक तसेच मातोश्री बंगला या ठिकाणी आंदोलनाचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे या पत्रात म्हटले आहे. एसटी कर्मचारी खासगी वाहने किंवा रेल्वेने येण्याची शक्यता आहे. मुलुंड चेक नाका, वाशी चेक नाका आणि दहिसर चेक नाका येथून प्रवेश करणार असून या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याची विनंती या पत्राद्वारे केली होती.
0 Comments