शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाल्याचे समजते. पवार आणि मोदी यांच्यामध्ये किमान २० ते २५ मिनिटे चर्चा झाली आहे. दरम्यान, राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना शरद पवारांनी त्यांच्या घरी स्नेहभोजनाला बोलावले होते. त्यावेळी भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील स्नेहभोजनाला उपस्थित होते. त्यानंतर आज पवार आणि मोदी यांच्यात भेट झाल्याने या घटनेचे राजकीय महत्त्व वाढले आहे.
महाराष्ट्रातील आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवारांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. त्यानंतर आज लगेचच पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने या घटनेचे राजकीय अर्थ निघत आहेत.
पवार आणि मोदी यांच्या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थतीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्याने कारवाई होत असल्याने यासंदर्भातही चर्चा झाली असल्याचे समजते. त्यातच काल शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीवर ईडीने जप्ती आणली. त्यामुळे याबाबत पवार मोदींना काही बोलले का? असा सवाल उपस्थित होत आहे.
0 Comments