येत्या१ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस (कागदरहित) असणार आहे.

 स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापली जाणार नाहीत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्यांना यंदाच्या अर्थसंकल्पाची छापील प्रत दिली जाणार नसून त्याऐवजी अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी दिली जाणार आहे.

यंदा परंपरा मोडीत

संसदेच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापण्यासाठी स्वतंत्र छापखाना आहे.  अर्थसंकल्पाच्या प्रति छापल्यानंतर त्या सीलबंद करून वितरण होईपर्यंत संबंधित १०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी याच ठिकाणी राहतात, तसेच छपाई झाल्यानंतर सर्वांसाठी हलवा बनविण्याची परंपरा आहे.  परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा मोडीत काढण्यात आली आहे.